अमळनेर (प्रतिनिधी) काळा बाजारात जाणार्या मारवड येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्याची तपासणी केली असता धान्यसाठ्यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे याप्रकरणी दुकानाचा सेल्समन, वाहनचालक व मारवड येथील एका व्यक्तिविरुद्ध जीवनावश्यक वस्तू काययद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १०५,१०६ मधून २६ रोजी रात्री वाहन (क्रमांक जी जे ०५ , सिव्ही ४८२९) मधून शासकीय तांदुळाच्या आठ गोण्या घेऊन जात असताना गावातील नागरिकांनी रंगेहाथ पकडून महसुल अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यावेळी सेल्समन अनिल काशिनाथ पाटील कुलूप लावून निघून गेला तर वाहन चालक प्रशांत विजय पाटील (रा जैतपिर) याने सांगितले की मला दिनेश वडर (रा मारवड) याने माल घेऊन जाण्याबाबत सांगितले होते. त्यावरून दोन्ही दुकाने २६ रोजी रात्रीच सील करण्यात आली होती. सील केलेली दोन्ही दुकाने २७ रोजी सकाळी नायब तहसीलदार संतोष बावणे यांनी सील उघडून पंचनामा केला असता दिवाळी काळात वाटपसाठी असलेली साखरक २ क्विंटल ,डाळ १ क्विंटल , व किरकोळ तेल आणि रवा असा माल शिल्लक होता तर अंत्योदय ,प्राधान्य योजनेतील धान्य पुस्तकाप्रमाणे अपेक्षित गहू साठा ८५.१३ क्विंटल हवा असताना प्रत्यक्ष ८४ क्विंटल म्हणजे १.१३ क्विंटल कमी आढळून आला तर तांदूळ साठा १२५.२३ क्विंटल अपेक्षित असताना तो १४१.३० क्विंटल म्हणजे १६.०७ क्विंटल जादा आढळून आला. याचा अर्थ ग्राहकांना वाटप करण्यात आला नाही. तसेच दुकानात लाभार्थी याद्या ,किरकोळ विक्री दर फलक नाही , दक्षता समिती सदस्य नावे आढळून आली नाही. म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आदेश दिल्यानुसार संतोष बावणे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला अनिल पाटील ,प्रशांत पाटील , दिनेश वडर यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सहा पोलीस निरीक्षक जयेश खलाने करीत आहेत.